छत्रपती संभाजीनगर, दि. ७ (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी) : राज्यातील विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीकस्पर्धा सन २०२६-२७ जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव होणार असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ इतर शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.
खरीप हंगाम २०२६ अंतर्गत ज्वारी, बाजरी, मका, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मुग व उडीद पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६, तर इतर सर्व पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना प्रति पीक रु. ३००, तर आदिवासी गटासाठी रु. १५० प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पीकस्पर्धेत सहभागी व्हावे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर सुनील वानखेडे यांनी केले आहे.

