छत्रपती संभाजीनगर;दि.११,(प्रतिनिधी)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता प्रक्रियेचे पालन करावे लागणार आहे.
शासनाच्या नवीन निर्देशानुसार, थेट स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार वसतिगृहात होईल, त्यांना तिथे प्रवेश दिला जाईल. मात्र, केवळ ज्या विद्यार्थ्यांना जागेअभावी किंवा गुणवत्तेमुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणे शक्य होणार नाही, अशाच विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ योजनेचा लाभ दिला जाईल.
जे विद्यार्थी वसतिगृहासाठी अर्जच करणार नाहीत, त्यांना दोन्ही योजनांपासून वंचित राहावे लागेल. ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहे उपलब्ध नाहीत, तिथे हा नियम शिथिल ठेवण्यात आला असला तरी, भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, ते विद्यार्थी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. शालेय अभ्यासक्रम ३० जून २०२६ आणि ११ वी, १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी १५ जुलै २०२६ पर्यंत
संबंधित विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले प्रस्ताव ऑनलाईन सादर करावेत, मुदतीनंतर सादर होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत तातडीने अर्ज करावेत.

