छत्रपती संभाजीनगर | महाराष्ट्र न्यूज टाइम्स |
पावसाळा सुरू होताच धरणे, घाट, धबधबे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, पर्यटनाच्या उत्साहात काहीजण सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ रोड, जटवाडा आणि रसूलपुरा परिसरात डोंगराच्या कड्यावर जाऊन रील्स व फोटो काढणे, वाहनांवर स्टंट करणे, ट्रिपल सीट प्रवास, भरधाव वाहनचालक आणि कर्णकर्कश आवाजात वाहने चालविण्याचे प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वाळूज एमआयडीसी परिसरातील खवल्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेने पावसाळी पर्यटनस्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कौटुंबिक वादानंतर एका १९ वर्षीय तरुणाने डोंगरावर धोकादायक ठिकाणी जाऊन आत्महानीची धमकी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
तब्बल तीन तास समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असताना त्याला सुरक्षितपणे मागे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या दुर्दैवी प्रकारात तरुणासह त्याच्या वडिलांचा आणि आईचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटनस्थळांवरील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पर्यटनस्थळांवर विशेष बंदोबस्ताची मागणी
पावसाळ्यात डोंगरकडे, दऱ्या, धबधबे आणि घाट परिसरात घसरून पडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक ठिकाणी जाणे, सेल्फी-रील्ससाठी जीव धोक्यात घालणे आणि वाहनांवर स्टंट करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पडेगाव-मिटमिटा रोड, दौलताबाद घाट, म्हैसमाळ, जटवाडा, रसूलपुरा तसेच अन्य पर्यटनस्थळांवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ट्रिपल सीट, भरधाव वाहनचालक, स्टंटबाजी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी आहे.
वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कडक कारवाई झाल्यास पावसाळी पर्यटन अधिक सुरक्षित करता येईल, असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
✍️ दिनेश गायके
संपादक | महाराष्ट्र न्यूज टाइम्स

