मुंबई, दि. ८ : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ व औषधांविरोधात पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
जेवणात, खाद्यपदार्थांमध्ये किंवा औषधांमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास नागरिकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार नोंदवावी. यासाठी विभागाने टोल फ्री क्रमांक 1800 222 2365, ई-मेल jc-foodhq@gov.in तसेच Food Safety Connect या मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या ॲपद्वारे नागरिकांना फोटो किंवा व्हिडिओसह थेट तक्रार नोंदवता येते. तसेच अन्नपदार्थातील घटक, FSSAI नियमांची माहिती, तक्रारीची सद्यस्थिती आणि अन्नसुरक्षेबाबत मार्गदर्शनही मिळते. तक्रार करताना संशयित अन्नपदार्थ किंवा औषधाचा अचूक पत्ता, संबंधित माहिती आणि शक्य असल्यास पुरावे जोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता भेसळ, निकृष्ट दर्जाचे किंवा असुरक्षित अन्नपदार्थ व औषधांबाबत माहिती द्यावी.
“आपला एक फोन कॉल अनेकांचे आरोग्य वाचवू शकतो. भेसळ दिसल्यास त्वरित तक्रार करा,” असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
महत्त्वाचे संपर्क
टोल फ्री : 1800 222 2365
ई-मेल : jc-foodhq@gov.in
मोबाईल ॲप : Food Safety Connect
भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

