पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1632 कोटी रुपयांची कर्जमुक्ती;
1 लाख 80 हजार 176 खातेदार पात्र, 712 जणांचे आधार संलग्नीकरण अद्याप प्रलंबित
छत्रपती संभाजीनगर, दि.3 (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)-शेतकऱ्यांसाठी शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार १७६ खातेदार कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास पात्र ठरले असून त्यांचे सगळ्यांचे मिळून १६३२ कोटी १२ लक्ष रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. अद्याप ७१२ शेतकऱ्यांचे आधार संलग्निकरण प्रलंबित आहे,अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध राष्ट्रियकृत, सहकारी बॅंकामार्फत कर्ज घेतलेल्या खातेदार शेतकऱ्यांपैकी एकूण १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले आहेत. त्यांची एकूण कर्जमाफीची रक्कम १६३२ कोटी १२ लक्ष रुपये इतकी आहे. आधार संलग्नीकरणानंतर ही आकडेवारी बॅंकांनी पोर्टलवर अपलोड केलेली आहे. आणखीन खातेदारांचे आधार संलग्निकरण व अन्य प्रक्रिया पार पडल्यावर या संख्येत वाढ होऊ शकते,असेही मोघे यांनी सांगितले आहे.
बॅंकनिहाय ही आकडेवारी याप्रमाणे-
बॅंक ऑफ इंडीया पात्र खातेदार ७३६३,रक्कम ७४ कोटी ३५ लक्ष रुपये.
बॅंक ऑफ बडोदा-८२६८, ९० कोटी ५५ लक्ष रुपये.
बॅंक ऑफ महाराष्ट्र- २६७०२, २५६ कोटी २ लक्ष रुपये.
कॅनरा बॅंक-६१२, ७ कोटी ९८ लक्ष रुपये.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया-५०२५, ६१ कोटी ८६ लक्ष रुपये.
जिल्हा मध्यवर्ती बॅंक-५६०१३,२१२ कोटी रुपये.
महाराष्ट्र ग्रामिण बॅंक-३५६७६, ३९१ कोटी रुपये.
इंडियन बॅंक-३७२९, ४२ कोटी २७ लक्ष रुपये.
इंडीयन ओव्हरसीज बॅंक-१२,४५ लक्ष रुपये.
पंजाब नॅशनल बॅंक-२६४२, ५० कोटी १३ लक्ष रुपये.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया-३१५१५, ४१५ कोटी ८ लक्ष रुपये.
युनियन बॅंक ऑफ इंडिया-१९५८,२० कोटी ८९ लक्ष रुपये.
आयडीबीआय बॅंक-६६१, ८ कोटी ६४ लक्ष रुपये.
अद्यापपर्यंत असे एकूण १ लाख ८० हजार १७६ पात्र खातेधारक असून त्यांची एकत्रित रक्कम १६३२ कोटी १२ लक्ष रुपये इतकी आहे.
जिल्ह्याशी संबंधित ही सर्व माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे,असेही मोघे यांनी सांगितले. पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यास या आकडेवारीत वाढ होऊ शकते.
तथापि, असे असले तरी जिल्ह्यात अद्याप ७१२ खातेदार असे आहेत की ज्यांचे बॅंक खाते आधार संलग्न नाही,असे निदर्शनास आले आहे. त्यात बॅंक ऑफ इंडिया-१, बॅंक ऑफ बडोदा-४८४, बॅंक ऑफ महाराष्ट्र-१६२, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया-२, जिल्हा मध्यवर्ती बॅंक-५, महाराष्ट्र ग्रामिण बॅंक-१२, स्टेट बॅंक ऑफ इंडिया-४०, युनियन बॅंक ऑफ इंडिया-६ असे एकूण ७१२ खातेदार आहेत.
या खातेदारांनी तात्काळ आपल्या बॅंकेशी संपर्क साधून आधार संलग्निकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी केले आहे.
निकषः- १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.एका किंवा अनेक बँकांमधील सर्व पात्र कर्जखात्यांवरील मुद्दल व व्याजासह एकूण थकबाकीची कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. यासाठी शेतीच्या क्षेत्रफळाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.
अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करण्यात आले असून त्याचे हप्ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असतील, तर अशा शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ मिळेल.
ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ चा लाभ घेतला आहे, त्यांना या नव्या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम ओटीएस अंतर्गत अदा केली जाईल.
२०१९ च्या कर्जमाफीचे लाभार्थी असल्यास ५० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीतील अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांनी भरल्यानंतरच त्यांना ५० हजार रुपयांचा ओटीएस लाभ मिळेल. शेतकऱ्यांना त्यांचा हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

