दिनांक २१ जून २०२६ आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधून, पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या वतीने गोकुळ मैदानावर सकाळी ६:०० वाजता विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “योग: कर्मसु कौशलम्” या उक्तीप्रमाणे, या योगअभ्यास मध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री. वीरेंद्र मिश्र यांची विशेष उपस्थिती होती. तसेच या प्रसंगी पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रकाश जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रशांत स्वामी यांच्यासह २०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि विशेषतः पोलीस दलातील अत्यंत धावपळीच्या व तणावपूर्ण दिनचर्येत आरोग्याचे रक्षण करणे हे एक मोठे आव्हान आहे. हेच लक्षात घेता, यावर्षीची ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ ही थीम अत्यंत समर्पक ठरली. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्यायामाची गरज आणि मानवी आरोग्याशी योगाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व, प्रात्यक्षिकांद्वारे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमात वॉर्मअप, सूर्यनमस्कार, विविध आसने (ताडासन, वृक्षासन, भुजंगासन इ.) आणि प्राणायामाचा सराव करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र म्हणाले की, “पोलीस दलातील कर्तव्याची व्याप्ती आणि ताण पाहता योगासनांची नित्य जोपासना अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज किमान काही वेळ योगासने व व्यायामाचा सराव केल्यास शारीरिक लवचिकता वाढते आणि मानसिक शांतता लाभते. पतंजली योग सूत्रानुसार ‘योगश्चित्त वृत्ती निरोध:’ म्हणजेच चित्ताच्या वृत्तींवर नियंत्रण मिळवणे म्हणजे योग होय. योगामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळते. जेव्हा योगाची मानसिक तयारी असते, तेव्हा माणूस आपल्या क्षमतेपेक्षा अधिक आणि उत्तम कार्य करू शकतो, ज्यामुळे कर्तव्यदक्षता आपोआपच वाढते.”
या प्रसंगी पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रकाश जाधव यांनीही पोलीस दलाच्या दिनचर्येत योगाचा समावेश करून तो एक जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “योग म्हणजे केवळ व्यायाम नसून ते स्वतःला शरीराशी, आत्म्याला परमात्म्याशी आणि माणसाला समाजाशी जोडण्याचे माध्यम आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितलेला अष्टांग योग (यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी) आपल्या जीवनात अमलात आणल्यास निश्चितच तणावमुक्त कार्यक्षमता प्राप्त होईल.”
योगशास्त्राचा महिमा हा अत्यंत प्राचीन असून, भगवद्गीतेपासून ते विविध योग ग्रंथांपर्यंत सर्वांनीच योगाच्या महत्त्वाला अधोरेखित केले आहे. ग्रामीण पोलीस दलाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाद्वारे, पोलीस दलातील प्रत्येक घटकाला आरोग्याप्रति जागरूक राहण्याचा आणि ‘निरोगी पोलीस, सक्षम समाज’ घडवण्याचा संदेश देण्यात आला.

