छत्रपती संभाजीनगर, दि. १९ जून (प्रतिनिधी) – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत २८ जून रोजी शहरात व्यापक लसीकरण अभियान राबविण्यात येणार असून, पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी केले आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्मार्ट सिटी कार्यालयात अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली कमिशनर टास्क फोर्सची बैठक पार पडली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. सय्यद मुजीब, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला भांबरे, पल्स पोलिओ मोहिमेच्या नोडल अधिकारी डॉ. मेघा जोगदंड, विविध विभागांचे अधिकारी, खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत मोहिमेच्या यशस्वी नियोजनावर चर्चा करण्यात आली. शहरातील सुमारे १ लाख ९९ हजार ५६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ६९१ पोलिओ बूथ, ५९३ घरभेट पथके, १३५ ट्रान्झिट पथके, २२ मोबाईल पथके आणि ३ विशेष रात्रीची पथके कार्यरत राहणार असून, एकूण २०५० कर्मचारी व स्वयंसेवक मोहिमेत सहभागी होणार आहेत.
२८ जून रोजी बूथ डे झाल्यानंतर पुढील पाच दिवस शहरातील विविध भागांमध्ये घरभेटीद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. बसस्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ, मॉल, धार्मिक स्थळे, बांधकाम साईट, वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या आणि इतर उच्च जोखीम क्षेत्रांमध्ये विशेष ट्रान्झिट व मोबाईल पथकांद्वारे बालकांचा शोध घेऊन लसीकरण केले जाणार आहे.
मोहिमेच्या व्यापक जनजागृतीसाठी शाळा रॅली, बॅनर, पोस्टर्स, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, वृत्तपत्रे, एफएम रेडिओ, केबल नेटवर्क तसेच धार्मिक स्थळांमधून प्रचार करण्यात येणार आहे. विविध स्वयंसेवी संस्था, आयएमए, आयएपी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, एनसीसी, एनएसएस, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि प्रसारमाध्यमांनी सक्रिय सहभाग नोंदवून मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी सर्व विभागप्रमुखांना जनजागृती, स्वच्छता, मनुष्यबळ उपलब्धता आणि उच्च जोखीम क्षेत्रांचे पर्यवेक्षण याबाबत आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला २८ जून रोजी जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
“दोन थेंब जीवनाचे” या संदेशासह शहरात पोलिओमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

