कधी काळी मातृसत्ताक राज्य पद्धती असलेला आपल्या देशात काळाच्या ओघात पुरूषप्रधान संस्कृतीचा शिरकाव झाला आणि सर्वत्र पुरूषसत्ताक कुटुंब व्यवस्था रूळली आणि रूजली. नंतरच्या काळात स्त्रियांना बरोबरीचा दर्जा राहीला नाही. जगभरात स्त्रियांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावी लागली. आपल्या देशात संविधानाने समान हक्क मान्य केला असला तरी आज समान वागणूक हा प्रश्न आहे. सोबत महिला मुक्ती तसेच महिला तसेच महिला सबलीकरण यावर देखील चर्चा होते. या बाबत सर्वोच्च न्यायालयाने एका अपघात विमा प्रकरणात ऐतिहासिक निवाडा दिला आहे तो महत्वाचा आहे. याद्वारे महिलांना गृहिणी न म्हणता राष्ट्र निर्मितीमधील एक व्यक्ती म्हणून मान्यता द्यावी असे भाष्य केले आहे.
साधारणपणे गृहिणीचे स्थान घराघरात रांधा-वाढा-उष्टी काढा इतपत मानले जाते. ती गृहिणी व्यक्ती म्हूणन जगताना जी विविध नाती जपते आणि त्या निमित्ताने जे कष्ट उपसत असते त्याचे मोल केले जात नाही. हे वास्तव नाकारता येणार नाही.
“जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी” असं आपण म्हणतो तर दुसरीकडे मुलगी शिकली प्रगती झाली…असही सांगतो. सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला त्याचा संदर्भ अपघात विमा दाव्याशी संदर्भ ठेवून आहे. घरातील एखादा कर्ता पुरूष अपघातात मरण पावला तर त्याचं वय, कमाई आणि अपेक्षित जीवनमान याच्या आधारे भरपाईची रक्कम ठरविली जाते.
अपघातात मरण पावलेली माहिला कमावती नसेल आणि ती केवळ गृहिणी असेल तर भरपाईचे मोजमापच नाही. म्हणूनच हा निवाडा महत्वाचा आहे.
घरात असणारी सर्व प्रकारची कामे, तसेच मुलांचे संगोपन, शिक्षण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्कार देण्यात गृहिणीचा मोठा वाटा असतो. पुरूषाने फक्त नोकरी-व्यवसाय करुन कुटूंबाच्या निर्वाहासाठी पैसा कमावणं इतकच आपला समाज मानतो. घरातील या कामांसाठी महिलांना पत्नी म्हणून पगार देणारा पती हा प्रकार आपल्याकडे नाही. त्यामुळे गृहिणी म्हणून ती व्यक्ती, ती स्त्री, आपल सर्वस्व झोकून देऊन नवी पिढी घडवत असते. प्रसंगी स्वत: उपाशी राहून मुलांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था करते. या अर्थाने ती नवी पिढी घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करते. म्हणून तीला ‘नेशन बिल्डर’ चा दर्जा असावा असे निरीक्षण मा.सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.
आपण जर आपल्या आयुष्यात जरा वळून बघितल तर जानवेल की ती गृहिणी म्हणून घरात वावरताना पत्नी, सून, आई, या विविध नात्यांची गुंफण जपत स्वत:ची पर्वा न करता आणि कोणत्याही आभाराची अपेक्षा न करता राबते आणि अगदी घरातील व्यक्ती म्हणून वावरताना ती सतत टोमणे सहन करीत असते. मुलं देखील हॉटेलमध्ये ऑर्डर द्यावी तशी खाण्यासाठी “ऑर्डर” सोडतात. हे घराघरातल चित्र आहे. नाही म्हणायला तिचा मोठेपणा मिरवायला हल्ली ग्रिटींग कार्ड, केक आिा पार्टीच्या माध्यमातून ‘मदर्स डे’ साजरा केला जातो.
घरातील स्त्रिया माता म्हणून मिळणारा मान वगळता इतर बाबतीत तिचं आणि तिच्या कामाचं महत्व दुर्लक्षित होत. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीवर सर्व अवलंबून असतात असे नव्हे तर कुटुंबातील कमावत्या सदस्यासोबतच सारं कुटुंब तिच्यावर अवलंबून असतं म्हणून ती ‘नेशन बिल्डर’.
‘मातृ देवो भव’ म्हणायचं, सण, उत्सवात दुर्गा व इतर देवींची पुजा करतो मात्र घरातलं दैवत वंचित राहतं. न्यायालयाच्या या निर्णयानं या निमित्तानं एक नवा विचार समोर आणला आहे आणि Gen Z सह सर्वांनाच तो मान्य असावा.
– प्रशांत दैठणकर
9823199466

