छत्रपती संभाजीनगर, : खामनदीला पुन्हा एकदा तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी सुरू असलेल्या खामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामांचा आज सकाळी आयुक्त अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. सकाळी 6.30 ते 9.00 या वेळेत झालेल्या पाहणीत उप आयुक्त-5 तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, मुख्य उद्यान अधिकारी डॉक्टर विजय पाटील तसेच विशेष कार्य अधिकारी (खामनदी प्रकल्प) असदउल्ला खान उपस्थित होते.
पाहणीदरम्यान प्रकल्पांतर्गत पूर्ण झालेल्या कामांसह प्रगतीपथावरील विविध कामांची तपासणी करण्यात आली. यावेळी नदीपात्रातील प्रदूषण, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, संरक्षण भिंतींची स्थिती तसेच मनुष्यबळाची कमतरता आदी बाबी निदर्शनास आल्याने संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाहणीत अनेक ठिकाणी दूषित व दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचे तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून येत असल्याचे आढळून आले. काही नागरिकांनी त्यांच्या मालमत्तींची मलनिस्सारण व्यवस्था अधिकृत ड्रेनेज यंत्रणेशी न जोडता थेट नदीत सोडल्याचेही निदर्शनास आले. तसेच भूमिगत गटार योजनेतील तुटलेल्या चेंबरमधूनही सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे आढळल्याने अशा प्रकारचे प्रदूषण तात्काळ थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
नदीपात्रालगतच्या वसाहतींमधील कचरा संकलन अधिक नियमित करण्याबरोबरच नागरिकांना नदीत कचरा टाकण्यास प्रतिबंध घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. नदीपात्रातील आणि नदीकाठावरील अतिक्रमणांबाबत नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाने समन्वय साधून तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
पाहणीदरम्यान नदीकाठावरील दगडी पिचिंगची काही ठिकाणी दुरवस्था झाल्याचे आढळून आले. आगामी पावसाळ्याचा विचार करून पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दगडांची दुरुस्ती व मजबुतीकरण तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले.
पानचक्की परिसरातील काही दुकानदारांकडून तसेच वक्फ बोर्ड कार्यालय परिसरातून नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधितांना नोटिसा बजावून महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करून खामनदी पुनरुज्जीवन प्रकल्पात त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे.
नदीपात्रातील वाढलेली जंगली झाडे व झुडपे यामुळे पाण्याचा प्रवाह अडथळला जात असून कचरा साचण्यास मदत होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही झुडपे काढून नदीपात्र स्वच्छ करण्याचे निर्देश उद्यान विभागाला देण्यात आले आहेत.
प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता देखील पाहणीत समोर आली. सध्या प्रकल्पावर अत्यल्प कर्मचारी कार्यरत असल्याने दहा कंत्राटी मजूरांची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कामांना अधिक वेग देण्यासाठी अतिरिक्त पोकलेन मशीन चालकासह उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
खामनदीचे पुनरुज्जीवन हे केवळ महानगरपालिकेचे काम नसून जनसहभागातून उभा राहणारा पर्यावरण संवर्धनाचा व्यापक उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. नदी प्रदूषण रोखणे, स्वच्छता राखणे आणि नदी परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था (NGO), एनसीसी तसेच विविध सामाजिक संघटनांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
खामनदीचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन हे शहराच्या पर्यावरणीय आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आगामी काळात या प्रकल्पातील कामांना अधिक गती देऊन नदीला प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि आकर्षक स्वरूप देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.

