छत्रपती संभाजीनगर, (महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी)दि. ०२ मे — छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर आणण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री मा. नामदार श्री. संजय शिरसाठ यांनी दिले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. १ मे) सायंकाळी आयोध्या नगरी येथे वेस्टर्न इमॅजरी या एजन्सीमार्फत शहरातील नवीन घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घनकचरा हस्तांतरण केंद्रांचेही प्रतिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री मा. नामदार श्री. अतुल सावे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच माननीय महापौर श्री. समीर राजूरकर, माननीय उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, माननीय स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये, माननीय सभागृह नेते श्री. गोविंद केंद्रे, विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत तसेच मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. शिरसाठ यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागामार्फत पुढील महिन्यात महानगरपालिकेला ड्रेनेज चोकअप शोधण्यासाठी अत्याधुनिक एन्डोबोट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्याही कामगाराला ड्रेनेजमध्ये उतरावे लागू नये, ही आपली भूमिका असून त्यासाठी ही यंत्रणा महापालिकेला दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मा. मंत्री श्री. अतुल सावे यांनी आपल्या मनोगतात शहराच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करताना छत्रपती संभाजीनगरची ओळख जागतिक स्तरावर निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. स्वच्छतेच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर देशात प्रथम क्रमांकाचे शहर बनावे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महापौर श्री. समीर राजूरकर यांनी शहरातील पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन हे दोन महत्त्वाचे विषय असल्याचे नमूद केले. नुकत्याच झालेल्या सिंगल यूज प्लास्टिकविरोधी कारवाईत सुमारे ९० लाख एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, ही देशातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले. याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले.
विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मनपा आयुक्त म्हणून कार्यरत असताना शहरातील पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापन या दोन प्रमुख समस्या होत्या. पाणीपुरवठा योजनेचे काम मोठ्या प्रमाणात मार्गी लागले असून आता घनकचरा संकलनासाठी अत्याधुनिक कॅप्सूल वाहने व यंत्रणा सुरू करण्यात आल्याने शहराच्या स्वच्छतेस मोठी मदत होणार आहे.
मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांनी सांगितले की, २०१८ मध्ये शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती अत्यंत आव्हानात्मक होती. मात्र आज शहर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या टप्प्यावर पोहोचले आहे. शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी घरातूनच ओला आणि सुका कचरा वेगळा करून देण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरिये यांचेही मार्गदर्शन लाभले.
कामगार दिनानिमित्त महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, सुपरवायझर, वाहनचालक आणि सफाई कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख श्री. नंदकिशोर भोंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त श्री. रणजीत पाटील यांनी मानले.






